मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – साईबाबा जन्मस्थळाचा वाद अद्याप पूर्णपणे शांतही झाला नव्हता तेच राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता या वादाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे जाणवू लागले आहे. कारण पाथरी हेच साई बाबा यांचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे पाथरीचा विकास जन्मस्थळ म्हणून व्हावा, अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी घेतली आहे.
पाथरी हे साईबाबांचं जन्मस्थळ असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर शिर्डीतील ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून हे प्रकरण मिटवले होते आणि त्यानंतर ग्रामस्थांनी देखील आंदोलन मागे घेतल होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात पाथरीला जन्मस्थळ म्हणून निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या. राष्ट्रपती देशाचे सर्वोच्च प्रमुख आहेत. त्यांच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे. पाथरीचा विकास हा साई जन्मस्थळाच्या दृष्टीने व्हावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
काय आहे नेमका हा वाद ?
पाथरीकर विरुद्ध शिर्डीकर असा हा वाद सुरु आहे. पाथरी करांनी साई बाबांचा जन्म पाथरीमध्ये झाला असल्याचे सांगितले आहे तर शिर्डीकर मात्र बाबानी कधीही आपले जन्म स्थान, जात धर्म याचा उल्लेख केला नसल्याचे सांगत आहेत. 1975 रोजी ब्रिटीशांना बाबा हे स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत असावेत, असे वाटले. त्यामुळे गुप्तहेर पाठवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. असा काही लोकांनी दावा करण्यात आला आहे. तर हा दावा खोटा असून बाबांचा जन्म तामिळनाडूत श्रीवैकुंठम् इथे झाला असल्याचा प्रतिदावा करण्यात आला आहे. एका तामीळ चरित्रात साईबाबांचे वडील साठे शास्त्री तर आई लक्ष्मीबाई असल्याचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे बाबा हे गुजराती ब्राह्मण कुटुंबात नंदलाल व जमनाबाई यांच्या पोटी जन्मल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही अनेकदा बाबांच्या जन्मस्थळाबद्दल दावे झाले. शिर्डी हेच साई बाबांचे स्थान असल्याचे अनेक भक्त सांगतात मात्र तरीही या विषयामध्ये अनेक फाटे फुटत असल्यामुळे बाबा नेमके कोण होते ? कोठून आले ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
Visit : bahujannama.com