बीड : बहुजननामा ऑनलाइन – ज्या राजकीय नेत्यांना वेळेचे महत्व समजते, ते या क्षेत्रात अधिक चांगली कामगिरी करू शकतात. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे होय. पवार नेहमीच योग्यवेळी राजकीय खेळी खेळतात आणि राजकीय तसेच सार्वजनिक जीवनात वेळेचे बंधनही कोटेकोरपणे पाळतात. राजकारणात ज्याचे टायमिंग चुकते त्याला बरेच काही गमवावे लागते असे म्हटले जाते. यामध्ये राजकीय फायद्यांसह लोकांचे प्रेम आणि पाठींबासुद्धा असू शकतो. सध्या असाच अनुभव राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना येत आहे. धनंजय मुंडेच्या घड्याळाची वेळ सध्या चुकत असल्याची चर्चा बीडमध्ये सुरू आहे.
धनंजय मुंडे यांच्या घडाळ्याची वेळ चुकतेय का? याची शंका येण्याचे कारण म्हणजे सध्या मंत्रिपद मिळाल्याने त्यांचे सर्वत्र सत्कार होत आहेत. परळी शहरात आयोजित जाहीर भव्य नागरी सत्कार सोहळ्यामध्ये धनंजय मुंडे उशीरा पोहचल्यामुळे त्यांना भाषण करता आले नाही. कार्यक्रमाला रात्री 10 वाजताची मर्यादा होती, आणि मंत्रिमहोदयांना मुख्य कार्यक्रमात येण्यासाठी 11 वाजले. यामुळे आपल्याच लोकांनी केलेल्या सत्काराला त्यांना उत्तर देता आले नाही.
आणखी एका जाहीर कार्यमातही असाच अनुभव उपस्थितांना आला. परळी-पिंपळा धायगुडा आंबेजोगाई रस्त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला येण्यास 9.40 मिनिटे झाल्याने नारळ फोडून कार्यक्रमाचा समारोप करण्याची वेळ त्यांच्यावर आली. यावेळीही परळीकरांना धनंजय मुंडे यांचे भाषण ऐकता आले नाही. यामुळे धनंजय मुंडे यांचे घड्याळ बिघडलेय की घड्याळाची वेळ चुकीची ठेवली गेली आहे, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
परळी आंबेजोगाई रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी एस के कॉन्ट्रक्शनने मोठे व्यासपीठ आणि बैठक व्यवस्था केली होती. परंतु, परळी तालुक्याची आढावा बैठक रात्री 9.30 वाजेपर्यंत चालल्याने धनंजय मुंडेना फक्त नारळ फोडून हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. या कार्यक्रमातही मुंडे यांचे भाषण झाले नाही.