मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यातच पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार नाही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले कि ,खोटं बोलत जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपाची खासियत आहे. मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला चांगलेच फटकारले असून सरकारच्या या कारभारावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मराठा आरक्षण आणि आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे स्पष्ट होत आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री प्रत्येक गोष्टीला त्यावर अभ्यास सुरु आहे असे सांगतात मग इतका अभ्यास करुनही न्यायालयासमोर त्यांचे सरकार फेल कसे होते? असा सवाल जयंत पाटील यांनी विचारला आहे.
मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी नव्याने करण्यात आलेल्या आरक्षणाच्या तरतुदी पदव्युत्तर वैद्यकीय व दंत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासूनच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यातील आर्थिकदृट्या दुर्बल घटकांसंदर्भातील निर्णयास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी स्थगिती दिली. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’कडून (एमसीआय) जागा वाढवून घेण्यात आल्या नसताना हा निर्णय लागू करता येणार नाही, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे.