मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘बाळासाहेबांनी जे स्वप्न बघितलंय ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आज १७ नोव्हेंबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ७ व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबल आणि जयंत पाटील यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. यावेळी छगन भजबल यांनी बाळासाहेबांना अभिवादन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘बाळासाहेबांसोबत मी २५ वर्षे कार्यरत होतो, त्यामुळे दिवसातून एकदा तरी रोज बाळासाहेबांची आठवण येते.’ असं म्हणत आठवणींना उजाळा दिला आहे.
स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर उपस्थित झाले आहेत. यावेळी छगन भुजबळ देखील तेथे दाखल झाले. छगन भजबल म्हणाले, ‘शिवसेनेत मी २५ वर्षे कार्यरत होतो, शिवसेनेच्या चढ-उतारात, लढ्यात मी प्रत्यक्ष सहभागी होतो. त्यामुळे, दिवसातून एकदा तरी बाळासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नांची पराकाष्ठा करुया’ असं म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थपनेच्या चर्चांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढल्याचे दिसून आले आहे. त्यात भुजबळ यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येणार असल्याचे संकेत मिळाले आहे.