नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नवी मुंबईतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेते गणेश नाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद निर्माण झाला असून तो थांबताना दिसत नाहीये. या नेत्यांनी निवडणुकीच्या भाषणात एकमेकांचा बाप काढत बाप बदलणारी औलाद नाही, असे आव्हाड म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला नाईकांनी उत्तर देत ‘पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनाही बाप बदलणाऱ्या औलादींमध्ये करणार का?’ असा सवाल केला आहे.
आव्हाड यांनी टीका केल्यावर नाईक यांनी त्यांना उत्तर दिले असून पवारांनीही तीन वेळा पक्ष बदलला असून त्यांचीही गणना बाप बदलणाऱ्यांमध्ये करणार का? असा प्रश्न केला आहे. पवारांनी समाजकारण आणि राजकारण गती यावी म्हणून एस काँग्रेसची स्थापना केली असताना पुलोद सरकारचे नेतृत्व केले होते. पण नंतर पुन्हा तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर १९९९ मध्ये पुन्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली. मग याला काय म्हणावं? असा प्रश्न नाईक यांनी केला आहे.
तसेच कोणीही एकाएकी पक्ष बदलत नाही. समाजकारण आणि राजकारणाला गती देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. स्वाभिमान जतन करण्यासाठी पक्षांतरासारखा निर्णय घ्यावा लागतो, हे आव्हाडांना कसं कळणार? असा टोलाही त्यांनी लगावला.