नवी मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – एक वेळ अशी होती जेव्हा इतर पक्षातील बड्या नेत्यांनी भाजपची वाट धरली. भाजपमध्ये इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाले मात्र आता भाजपमधून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. निमित्त आहे पुढे येऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे. मात्तबर नेते आमदार गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे नवी मुंबईत पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता जात भाजपचा झेंडा फडकला. पण आता मात्र राजकीय फासे पालटण्याची शक्यता आहे कारण भाजपचे १५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीतून गणेश नाईकांसोबत भाजपमध्ये गेलेले 15 नगरसेवक घरवापसी करणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपशी काडीमोड घेत शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून नवी मुंबईत भाजपला खिंडार पाडण्याच्या तयरीत आहे.
भाजपचे 15 नगरसेवक शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षात भाजपच्या नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर नवी मुंबईमध्ये पालिकेची स्थापना झाल्यापासून गणेश नाईकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्याकडून सत्ता काढून घेणं तसं सोप नसलं तरी अनेक नगरसेवक हे पक्षामध्ये नाराज आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्यांना राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा आहे.
नाराजी दूर करण्यासाठी बैठका सुरु
भाजपला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक नगरसेवकांच्या संपर्कात आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी बैठका सुरू आहे. त्यात त्यांना यश येतानादेखील दिसत आहे. त्यामुळे नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर तर 15 नगरसेवकांवरून हा आकडा वाढण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे यात आता शिवसेना आणि राष्ट्रवादीला यश येतं की गणेश नाईक पुन्हा किंगमेकर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Visit : bahujannama.com