बहुजननामा ऑनलाइन टीम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ मधील बीआयटी चाळीतील निवासस्थान व मुंबईतील चिरागनगर, घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असणारे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या चाळीतील रहिवाशांचे म्हाडामार्फत त्याच विभागात पुनर्वसन केले जाणार आहे.
आव्हाड यांनी शनिवारी म्हाडा मुख्यालयास भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जडणघडणीच्या काळात म्हणजे १९१२ ते १९३४ असे २२ वर्षे परळ येथील चाळीत वास्तव्य करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवासस्थानास महापरिनिर्वाण दिनी भेट देऊन निवासस्थानाचे राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा केली. तसेच, घाटकोपर चिराग नगरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या कामाला गती देण्यात येणार असून तेथील रहिवाशांचे एसआरएमार्फत त्याच विभागात पुनर्वसन करण्यात येईल, असे आव्हाड यांनी सांगितले. या दोन्ही स्मारकांना पर्यटनाचा दर्जा देण्यात येणार आहे.
मुंबईमध्ये वसाहतींच्या पुनर्विकासातून मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासंदर्भात सरकारतर्फे प्रयत्न करण्यात येणार आहेत. मध्यमवर्गीय मराठी माणसाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणारे म्हणून म्हाडाची ओळख आहे. मुंबई मंडळाच्या निवासी कार्यकारी अभियंता (पुनर्विकास कक्ष) यांच्यासाठी विकसित आरइइ संगणक प्रणालीच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रस्ताव सादर करावयाचा आहे.