नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीसोबत चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यात आंध्रप्रदेशची विधानसभा निवडणूक सर्वात जास्त चर्चेत राहिली आंध्रप्रदेश मधील तेलगू देसम पक्षाला पराभूत करून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वाएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर जगमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देशात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्र्याची नियुक्ती होणार आहे.यामुळे आंध्रप्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
आंध्रप्रदेशातील नव निर्वाचित जगमोहन रेड्डी यांच्या वाएसआर यांनी राज्यात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत सर्व जातींना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार मुस्तफा साईक म्हणाले की, आंध्रप्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री असणार आहे. एससी, एसटी, मागास, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायीतील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.
नुकत्याच झालेल्या आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने तब्बल १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. २०१४ मध्ये टीडीपीने १०२ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. तर वायएसआर काँग्रेसला ६७ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या.