येवला बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले. देशातील तसेच राज्यातील भाजप सरकाने जनतेला भूलथापा मारत सत्ता काबीज केली खरी पण अजूनही जनतेचे प्रश्न प्रलंबित आहेत. इंधन दरवाढ, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदी प्रश्न निकाली निघाले नाही तसेच तिवरे धरण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कर लावण्याची घोषणा करताच झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण होत असून, अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सरकारने वेळीच दखल घेत शेतकरी, नागरिकांची ओढाताण थांबवावी, यासाठी सरकारला जागे करण्यासाठी टाळनाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांनी दिली.
यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष समीर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई पालवे, प्रा. अर्जुन कोकाटे, नंदकुमार शिंदे, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, राजेंद्र गणोरे, सुकदेव मढवाई, अमोल फरताळे आदी उपस्थित होते.