बहुजननामा ऑनलाईन – तालुक्यात करप्या रोग बुरशी, मुन्नी अशा अनेक रोगामुळे हाताशी आलेली पीक भुईसपाट झाली आहेत. या पीकांचे तत्काळ पंचनामे करून पिक विमा लागू करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गजानन पाटील चव्हाण यांनी केली आहे. नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन नायगाव तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
निवेदनात म्हटले आहे की, नायगाव तालुक्यासह नांदेड मराठवाडा तसेच महाराष्ट्रामध्ये देखील हा घातक करप्या रोग, बुरशी, मुन्नी, अशा अनेक रोगांच्या प्रादुर्भावामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे आणि कमी पाण्याच्या अभावी व काही ठिकाणी जास्ती पाण्यामुळे हाताशी आलेली पीक पूर्णत: भुईसपाट झालेली आहेत. सोयाबीन, कपाशी, तुर, ज्वारी या पिकाला गेल्या दीड ते दोन महिन्यापासून मुबलक पाणी मिळाले नसल्याने आणि कमी पाण्याच्या अभावी पूर्णत: हाताशी आलेली पीके जागेवरच करपुन, वाळुन जात आहेत. सोयाबीनच्या शेंगा कमी प्रमाणात लागलेल्या आहेत. यापूर्वी मूग, उडीद हे दोन प्रमुख पिक जास्तीच्या पावसामुळे शेतामध्ये जागेवरच सडून गेले आहे.
नायगाव तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनाची प्रत नांदेड जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री, पालकमंत्री, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, उपजिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी नायगाव या सर्वांना पाठवण्यात आली आहे.
यावेळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनावर नगरसेविका पार्वती शंकरराव पाटील चव्हाण, नगरसेवक देवीदास पाटील बोमनाळे, शेख तबस्सुम, भाऊसाहेब पाटील चव्हाण, रघुनाथ सोनकांबळे, गजानन पाटील चव्हाण, देवदास पाटील वडजे, गंगाधर पाटील कल्याण, शंकर पाटील वडजे टेंभुर्णीकर, संजय पाटील चव्हाण, हरिचंद्र पाटील चव्हाण, कैलास भालेराव, माधव शंकर कल्याण, सय्यद एजाज, राजाभाऊ सोनकांबळे, माधव वसंतराव चव्हाण, चंद्रकांत पाटील तमलुरे, प्रदीप देमेवार, अतुल मंगरुळे, अविनाश पाटील चव्हाण, संजय गुजलवार, शरद पाटील महागावे, धनराज चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत.