बहुजननामा ऑनलाइन टीम – जागेवरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून शस्त्राने सपासप वार करत एका भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या केली. नागपूर(Vegetable seller brutally ) शहरातील आठवडे बाजारात मंगळवारी (दि. 12) दिवसाढवळ्या हा प्रकार घडला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या भाजी विक्रेत्याला पाहून बाजारात गोंधळ उडाला होता. या घटनेने नागपूर शहर हादरले आहे. या प्रकरणी चौघा भावांवर गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय किशोर निर्मले (वय 23 ) असे मृत भाजी विक्रेत्याचे नाव आहे. तर, त्याची हत्या करणारे आरोपी दोन सख्खे तर दोन चुलत भाऊ आहेत. आरोपीची आठवडी बाजारात प्रचंड दहशत आहे. ते बाजारात जागा देऊन खंडणी वसुलीही करतात. तर अक्षय निर्मले हा सुद्धा गुन्हेगारी वृत्तीचाच होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आठवडा बाजार भरला होता. त्याच वेळी बसलेल्या भाजी विक्रेत्यासोबत चौघा भावांनी मिळून वाद घातला. तिथे बाचाबाची झाली एकमेकांची कॉलर धरून हाणामारीपर्यंत प्रकरण गेलेे. चौघांनी भाजी विक्रेत्यासमोरची भाजी सगळी उधळून लावली आणि तिथे वाद चिघळला. जागेवरून झालेला हा वाद हत्येपर्यंत पोहोचला. डोक्यात राग घातलेल्या या 4 भावांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी भाजी विक्रेत्याला बेदम मारहाण केली. धारदार शस्त्राने सपासप वार केले. भाजी विक्रेता रक्ताच्या थारोळ्यात पडला. याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी चार भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.