मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादीच्या नेत्या, आमदार विद्या चव्हाण यांनी स्पष्ट शब्दात त्यांच्यावर असलेला नातू हवा म्हणून सुनेचा छळ केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कळल्यानंतर माझ्या मुलाने घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेने आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळे ती असे वागत असून न्यायालयात खरेखोटे सिद्ध होईल,’ असं त्यांनी म्हटले आहे.
चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि शीतल या पाच जणांविरुद्ध पोलिसांनी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तक्रारीत दुसरीही मुलगी झाल्याने तिचा छळ केल्याचे म्हटले आहे. पण हे सर्व आरोप खोटे असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले. तसेच त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला आहे. ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्ताने डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवस आधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. त्यातून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला धक्का बसला. त्याने त्याबाबत आम्हाला सांगितले. नंतर गौरीशी (सून) बोलून वेगळे होण्याचा निर्णय सांगितला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचे लक्षात येताच तिने वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केला आहे. अर्थात, ती खोटं बोलते आहे, हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही,’ असे चव्हाण यांनी सांगितले.
‘गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणं शक्यच नाही. माझ्या दोन्ही सुनांना मी मुलींसारखंच वागवलंय. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप निराधार आहेत. गौरीला पहिली मुलगी झाली तेव्हाही आम्हाला आनंद झाला होता आणि दुसऱ्या मुलीच्या जन्माचाही आनंदच आहे. वकिलाच्या किंवा अन्य कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती तसं वागतेय. खरंतर माझा मुलगा आणि सून दोघेही सज्ञान आहेत. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पुढं काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. नवरा-बायकोच्या वादात मला विनाकारण ओढण्यात आलंय, असे त्यांनी सांगितले. तसेच गौरीशी याबद्दल काहीही बोलणे झालेले नसून तिच्या आई-वडिलांना मी पत्र लिहिणार आहे. आपले चांगले संबंध असताना असं का व्हावं, अशी विचारणा त्यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.