संकेश्वर : बहुजननामा ऑनलाईन – शेतीच्या बांधावरून झालेल्या वादातून वृध्द शेतकऱ्याचा खुरप्याने वार करून खून करण्यात आला. मत्तीवडे (ता. हुक्केरी ) येथील उंदुरे मळ्यामध्ये शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पासाहेब कृष्णा उंदुरे (वय 72 रा. मत्तीवडे ) असे खून झालेल्या वृध्द शेतकर्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी विष्णू मल्लाप्पा उंदुरे (वय 75) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. लक्ष्मण अप्पासाहेब उंदुरे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
संकेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मत्तीवडे गावातील उंदुरे मळ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या विष्णू उंदुरे व अप्पासाहेब उंदुरे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेताच्या बांधावरून वाद होता. त्यातून अप्पासाहेब उंदुरे यांच्यावर विष्णू उंदुरे याने खुरप्याने वार करत खून केला. उजव्या पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना तातडीने गडहिंग्लज येथील रुग्णायात दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. संकेश्वर पोलीस तपास करत आहेत.