बहुजननामा ऑनलाइन टीम – सध्या राष्ट्रवादीचे दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे(Thackeray government ) आरोप झाले असताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून अटक झाली आहे. त्यामुळे विरोधक महाविकास आघाडीवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांना उत्तर दिल आहे. “विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतले पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही, असा विश्वास खा. राऊत यांनी व्यक्त केला आहे.
खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी (दि.15) राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंडे आणि नवाब मलिक यांच्या निमित्ताने विरोधक सध्या महाविकास आघाडीवर निशाणा साधत आहेत. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका होत आहे. या टीकेला खा. राऊत यांनी उत्तर दिले आहे. विरोधक उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत असल्यासंबंधी विचारले असता खा. राऊत म्हणाले की, राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झाल तरी राजीनामा घ्या असे ते म्हणतात, असे जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखेच आहे. प्रत्येक आरोपाला उत्तर दिल पाहिजे, असे काही घटनेत लिहले नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही, असे खा. राऊत म्हणाले.