मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग मागील काही दिवसांपासून वाढत आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीन आठवडे कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लॉकडाऊन संदर्भात मोठे विधान केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ही स्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करेल, असे स्पष्ट शब्दात राजेश टोपे यांनी सांगितले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कठोर निर्बंध लागू केले आहेत. यातून आम्ही कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरु असे आजतरी वाटत आहे. परंतु ही स्थिती सुधारली नाही. रुग्णवाढ कायम राहिली.वैद्यकीय सुविधा आणि औषधे अपुरी पडू लागली तर सरकारला कडक लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागले. त्या स्थितीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व आरोग्य सुविधा आणखी सक्षम करण्यासाठी आम्हाला 15 दिवस ते तीन आठवड्यांचा संपूर्ण लॉकडाऊन करावा लागेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. या परिस्थितीत आम्हाला केंद्राकडून मदतीची आणि योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे नमूद करताना ढिसाळ नियोजनाचा जो आरोप केला जात आहे तो टोपे यांनी फेटाळून लावला आहे. कोरोना संदर्भातील कोणतीही माहिती आम्ही लपवून ठेवलेली नाही. आकडे अधिक दिसत असले तरी जी वस्तुस्थिती आहे ती आम्ही नियमितपणे मांडत आहोत, असा टोला राजेश टोपे यांनी लगावला आहे.
राज्यात चाचण्यांची संख्या वाढवताना कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन तपासण्या करण्यात येत आहेत. याचवेळी तातडीने उपचार देण्यावर आमचा भर राहिला आहे. यातून कोविडवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, नागरिकांमध्ये मधल्या काळात जो निष्काळजीपणा दिसून आला त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. कोरोनाचा पुन्हा एवढा उद्रेक होईल, असे आम्हाला वाटले नव्हते, असेही टोपे म्हणाले.
लस पुरवठ्यावरुन केंद्राकडून करण्यात आलेला दावा राजेश टोपे यांनी खोडून काढला आहे. केंद्राने जो प्रोटोकॉल निश्चित केला आहे तो राज्याकडून पाळला जात आहे, असे टोपे यांनी सांगितले. तसेच त्यांनी आकडेवारी सांगितली. मुंबईत 120 लसीकरण केंद्रांपैकी 70 केंद्र आज कोरोना लस उपलब्ध नसल्याने बंद करावी लागली. लसीकरणाची ही अवस्था चिंता वाढवणारी असल्याचे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.