बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने हे आता दिल्लीत यासंदर्भात हालचालींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याआधी आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील पार पडली. राज्यात लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात यावी, यासाठी जोरदार हालचाली सुरू असून अनेक फॉर्म्युल्यांवर मांडले जात आहेत.
अनेक दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये अनौपचारिक बैठका होत असून त्यात एका फॉर्म्युल्यावर सगळ्यांचं एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. १६-१५-१२ अश्या प्रकारे मंत्रिपदाची वाटणी होण्याची शक्यता आहे. यात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १५ तर काँग्रेसच्या वाट्याला १२ मंत्रिपदं दिली जावू शकतात. म्हणजेच एकूण ४२ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या फॉर्मुल्याप्रमाणे शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद तर उरलेली अडीच वर्ष राष्ट्रवादीला मिळावं. अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मागणी आहे. शिवसेनेलाही याबाबत काहीही आक्षेप नसून उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर अजुन एकमत झालेलं नाही. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच इतर मित्रपक्षांनाही विश्वासात घेणार असून सोबतच भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
लवकरच होणार शपथविधी
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी येत्या ४-५ दिवसांत आम्ही सरकार स्थापन करू असा दावा केला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे आमदार अब्दुल सत्ता यांनी सांगितलं की, पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना मुंबईला बोलवण्यात आलं असून सत्ता स्थापनेचं चित्र शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे हेच ह्या पाच वर्षांसाठी राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी सर्व आमदारांची मागणी आहे. तसेच, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव पुढं आल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही पाठिंबा मिळेल, अशी चर्चा रंगली आहे.
Visit : bahujannama.com