बहुजननामा ऑनलाईन – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसंदर्भातील सत्ताधारी गटाची याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. त्यामुळं गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे.
गोकुळच्या सत्ताधारी गटानं अशी मागणी केली होती की, कोरोनाच्या संकटात राज्य सरकारच्या आदेशानुसार निवडणूक 31 मार्चपर्यंत स्थगित करावी. परंतु न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली आहे. निवडणुकीचं काम पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवावं, असे आदेशही कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं आता गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार हे निश्चित झालं आहे. अंतिम मतदार यादीनंतर प्रत्यक्ष अर्ज भरणे आणि मतदानाच्या तारखा कधी जाहीर होतात, याकडे राजकीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.
कोरोनाचे कारण देऊन सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात काही संस्था उच्च न्यायालयात गेल्या होत्या. त्यात गोकुळची प्रक्रियादेखील सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. कोर्टाच्या आदेशानंतर गोकुळची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय प्राधिकरणानं घेतला. परंतु सत्ताधारी नेत्यांनी मात्र याला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली आहे.
‘गोकुळमध्ये महाआघाडी म्हणून एकत्र लढणार’
गोकुळच्या निवडणुकीसंदर्भातील सत्ताधारी गटाची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, आम्ही गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. माझी, पालकमंत्री सतेज पाटील आणि पीएन पाटील यांची याबाबत मुंबईत एक बैठक झाली. अजून काही बैठका होतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.