नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने (NCRB) एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार देशभरातील महिला आणि लहान मुलं यांच्या तस्करीची अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. यात अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईनं यात मानवी तस्करीच्या आकडेवारीत उच्चांक गाठला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा डाटा गोळा करण्यात आला. २०११ साली सर्वोच्च न्यायालयानं एक समिती गठित केली होती. या समितीनं आपला अहवाल २०१९ साली सादर केला.
अशी आहे आकडेवारी
NCRB नं दिलेल्या माहितीनुसार जबरदस्तीनं विवाह करणे, बाल कामगार, लैंगिक शोषण अशा कारणांसाठी ही मानवी तस्करी करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, २०११ जनगणनेनुसार मुंबई आणि दिल्ली क्रमश: १८,३९४,९१२ आणि १६,३४९,८३१ सहीत सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरं होती. कोलकाता १४,०३५,९५९ लोकसंख्येसोबत तिसऱ्या क्रमांकाचं शहर होतं.
लहान मुलं गायब होण्याचं प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक
लहान मुलं गायब होण्याचं प्रमाण सर्वाधिक मध्य प्रदेशात नोंदवण्यात आलं तर महिला हरवल्याच्या तक्रारी महाराष्ट्रात सर्वाधिक नोंदविण्यात आल्या. २०१६-१८ दरम्यान मुलं आणि महिला दोन्हीही हरवल्याच्या तक्रारी नोंदविण्यात पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलं. कोलकातामध्ये २०१८ साली २५८४ महिला बेपत्ता झाल्याची सूचना दिली होती. राज्यातील नदिया हा जिल्हा २४६८ महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवत दुसऱ्या क्रमांकावर होता. तसंच मुलं बेपत्ता होण्याच्या ९८९ प्रकरणांची नोंद कोलकातामध्ये करण्यात आली. तर, मध्य प्रदेशात इंदोरमध्ये २०१७ आणि २०१८ मध्ये क्रमश: १७५५ आणि २४५८ महिला बेपत्ता असल्याची प्रकरणं नोंदवली गेली. याच दरम्यान इंदोरमधून क्रमश: ५९६ आणि ८२३ लहान मुलं बेपत्ता झाली होती.
मजुरीसाठी तस्करी
या अगोदर २०१८ साली ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अॅन्ड क्राईम (UNODC) ग्लोबल’कडून एक अहवाल जाहीर करण्यात आला होता. या अहवालानुसार, लैंगिक शोषणासाठी तस्करी करण्यात आलेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त होती. जबरदस्तीनं मजूर वर्गासाठी तस्करी करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये ३५ टक्के महिला-मुलींचा समावेश होता. मजुरीसाठी तस्करी करण्यात आलेल्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण अधिक होतं.
मानवी तस्करीत मुंबई ,पुणे, ठाणे आघाडीवर (२०१७-२०१८)
अहवालानुसार, मानवी तस्करीचं सर्वात मोठं प्रमाण मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरात नोंदविण्यात आलं. मुंबईत २०१७ आणि २०१८ साली क्रमश: ४७१८ आणि ५२०१ महिला बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट दिसतंय. ही सर्वाधिक संख्या आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात दोन्ही वर्षांत क्रमश: २५७६ आणि २५०४ प्रकरणांची नोंद करण्यात आली.