मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याला मंजुरी दिली. यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला आहे. सत्ताधारी सरकारच्या आमदारांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून विधानपरिषदेत गोंधळ घातला. त्यावरुन युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही, हेच स्पष्ट होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
धनगर आरक्षणाबाबतचा टिसचा अहवाल सभागृहापुढे सादर न करता अटॉर्नी जनरलकडे सुपूर्द करण्यात आला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही हेच खरे. आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेता येत नसल्यानेच, सत्ताधारी सभागृहात गोंधळ घालून चर्चा होऊ देत नाही. धनगर आरक्षणविरोधी सरकारचा निषेध! pic.twitter.com/il54KEPZOq
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 27, 2019
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी धनगर समाज आणि मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचा प्रश्न उपस्थित केला. धनगर आरक्षणाचा मुद्दा २०७ नियमान्वये चर्चेला येणार होता. मात्र, चर्चेतून हा विषय बाहेर येऊ नये यासाठी सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. सरकार भ्रष्टाचारावर चर्चा करायला तयार नसल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. प्रश्नोत्ताराच्या तासाला पहिला प्रश्न धनगर आरक्षणाचा होता. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी गोंधळ घातला त्यामुळेच, सभागृहाचे कामकाज दिवसभर बंद ठवण्यात आले. असा आरोपही मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
दरम्यान, विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरला आहे. धनगर समाजाला मागणीप्रमाणे आरक्षण द्यावं, यासाठी विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येत आहे.
मुंडे यांनी काय केले आरोप ?
सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही
सरकार भ्रष्टाचारावर चर्चा करायला तयार नाही
प्रश्नोत्ताराच्या तासाला पहिला प्रश्न धनगर आरक्षणाचा होता पण सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला.