बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार कंगना रणौत वादावर आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी विस्तृतपणे भूमिका मांडली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी विरोधी पक्षांसह कंगना प्रकरणाचा समाचार घेतला आहे.
कंगना प्रकरणानंतर संजय राऊतांनीही तिला खूप काही सुनावलं होतं. मुलाखतीत बोलताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आता शिवसेना पुढं काय करणार ? याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही वारंवार शिवसेनेला प्रश्न विचारताय. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीये, ती महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप सर्व एकत्र आले आहेत. म्हणून तर यासंदर्भात सर्वात आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महारष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत या तिघांनीही ठामपणे सांगितलं मुबंई विरोधात वक्तव्य करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे. एखाद्या पक्षाचा आहे ?” असा सवालही त्यांनी केला.
बोलवता धनी कोण आहे ?
संजय राऊत यांना बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “या सगळ्या प्रकरणात कंगना रणौत वगैरे लोकांचं समर्थन कोण करतंय ? आम्ही नाही करत. भारतीय जनता पक्ष समर्थन करतोय. का करतं ? खरंतर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे कुठल्याच राजकीय नेत्यानं राहू नये. भाजपनं समजून घेतलं पाहिजे. तेही कालचे राज्यकार्ते होते. इथं भाजपचं राज्य असलं असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं. एखाद्या चॅनेलवर नरेंद्र मोदी साहेबांवर, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेखात कुणी काही बोललं असतं तर तुरुंगात गेलं असतं. इतर राज्यात तसं झालंय. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढलं, कुणी लिहिलं तर तुरुंगात गेलेत. महाराष्ट्रात तशी परंपरा नाही. आम्ही संयमानं वागतो. काटोकोरणणे वागतो. कायद्याचं पालन करतो. त्याचा गैरफायदा हे लोक घेतात.” अशी टीका राऊतांनी केली.