बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यामुळे बहुतांश नागरिक कामाच्या ठिकाणी अडकले आहे. त्यांना घरी पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने काही अटींसह परवानगी दिली आहे. मात्रा, कोरोनाच्या रेड झोनमुळे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील कोणालाही गावाकडे जाता किंवा येता येणार नाही.
आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. असे अधिकार असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही. पण या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: कामगार, मजुरांना) जाण्याची परवानगी आहे. मुंबई किंवा पुण्यातून तुम्हाला राज्याबाहेर जायचे असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील करोनाची प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
अनधिकृत किंवा ऐकीव, सांगोवांगीने दिल्या जाणार्या माहितीवर विश्वास ठेवू नये, कोणीही कुठेही धावाधाव करू नये. राज्य शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी सरकरकडून करण्यात आले. महापालिका आयुक्तांनी ‘कंटेनमेंट झोन’ची हद्द निश्चित केल्याशिवाय मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि पिपंरी चिंचवड महानगर प्रदेशातील लोकांना अन्य जिल्ह्यात जाता येणार नाही. मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यातील करोना ‘हॉट स्पॉट’ म्हणून जाहिर करण्यात आलेल्या क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करताना अत्यंत खबरदारी घ्यावी. तसेच दोन्ही जिल्हयातील जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेनेच स्थलांतर करावे असेही आदेशात म्हटले आहे.
एनपी न्यूज 24 नेटवर्क