कऱ्हाड : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यासह अन्य ठिकाणची सैनिक भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. अशा इच्छुकांची संधी वाया जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खास बाब म्हणून यंदा सैनिक भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह रक्षाप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्याकडे केली.
खासदार पाटील यांनी संबंधितांना प्रत्यक्ष भेटून ही मागणी केली. कोरोनामुळे गेल्या वर्षापासून सैन्य भरती झालेली नाही. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी भरतीप्रक्रिया कोल्हापूर येथे घेतली जाते. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मेहनत घेतात.
मात्र, सैन्यभरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत असल्याने संधी हूकत आहे. कोल्हापूर येथे होणारी भरती पुन्हा काही काळ स्थगित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या इच्छुक असलेल्या तरुणांची वयोमर्यादा संपू शकते, त्यामुळे वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.