पुणे : बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे आजपासून म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी एकच गर्दी केली होती. आज सुमारे 2 हजारांपेक्षा अधिक भाविकांनी बाप्पांचे दर्शन ( two-thousand-devotees-took-darshan-of-dagdusheth-halwai-ganapati) घेतले. येणारा प्रत्येक भाविक फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसून येत होता.
याचदरम्यान भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यावेळी जवळपास 52 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही किंवा मास्कदेखील अनेकांनी वापरले नव्हते. यावर मुळीक यांना विचारले असता, कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करूनच दर्शन घेतले आहे. तसेच येथे गर्दी होणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
यावेळी मुळीक म्हणाले की, देशभरातील काेरोना आजाराची परिस्थिती आटोक्यात येत आहे. मात्र, त्यादरम्यान आपल्या राज्यातील सर्व गोष्टी लवकरच सुरू होण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आम्हाला अनेक वेळेला आंदोलन करावे लागले आहे. आमच्या आंदोलनास यश आले असून, आजपासून मंदिरे खुली झाली आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.