मुरादाबाद : वृत्तसंस्था – सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवणार्या तज्ज्ञांच्यानुसार संपूर्ण देशात पाळेमुळे खोलवर गेलेल्या सायबर गुन्हेगारांचा व्यवसाय दोनशे कोटींच्याही पुढे गेला आहे. सावधानता आणि जागरूकतेनेच सतत वाढणार्या सायबर गुन्हेगारीला रोखता येऊ शकते. अन्यथा थोडी चूक झाली तरी तुमची मोठी कमाई हातातून निसटू शकते.
गुन्ह्यांचे प्रमाण वाढतेय
फॉरेन्सिक विंगचे संचालक आणि सायबर तज्ज्ञ संजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार टेक्नोलॉजिच्या या जगात प्रत्येक गोष्ट सोपी झाली आहे. यामुळे सायबर गुन्हेसुद्धा मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. कम्प्यूटरपासून मोबाईल फोन आणि एटीएम कार्डपासून बँक अकाउन्टपर्यंत सायबर गुन्हेगार पोहोचले आहेत. देशात सायबर गुन्ह्यांचा बाजार सुमारे 200 कोटीच्या पुढे गेला आहे. यामध्ये 99 टक्के प्रकरणे फाइनान्शियल फ्रॉडची असतात.
फोन स्विच ऑफ होताच व्हा सावध
सायबर गुन्हेगार सिम हरविल्याचे खोटे शपथपत्र देत आहेत. खोटी सही, शिक्का मारून ते मोबाईल कंपन्यांकडून नवीन सिम घेत आहेत. यानंतर संबंधित व्यक्तिच्या बँक अकाउन्ट आणि एटीएमचे डिटेल्स मिळवून पैसे चोरत आहेत. अशा स्थितीत मोबाईल चार-पाच तासांसाठी बंद झाल्यास ताबडतोब सावध झाले पाहिजे. याशिवाय कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून सुद्धा फसवणूक केली जात आहे.
सावधानता बाळगा
बँक खाते क्रमांक, कार्ड क्रमांक, पिन, ईमेल आयडी आणि पासवर्ड, मोबाईल नंबर आणि यूजर आयडीची माहिती फोनवर कुणालाही देऊ नका. डिटेल न दिल्यास खाते बंद होईल असे सांगितले तरी घाबरू नका, थेट पोलिसांना कळवा. मोबाईल फोन बंद ठेवण्यासाठी फोन करून सांगितल्यास सावध व्हा. या बहाण्याने ओटीपी आणि इतर डिटेल काढली जाते. वेळोवेळी एटीएम आणि क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलत रहा. एटीएम अथवा पीओएस मशीनचा उपयोग करताना कीपॅड झाकून ठेवा. एटीएमच्या डिटेल्स तसेच पासवर्डची माहिती कुणालाही देऊ नका, केबिनमध्ये कुणालाही येण्यास परवानगी देऊ नका. सायबर कॅफेतून ऑनलाइन व्यवहार करू नका.
Visit : bahujannama.com