पुणे : बहुजननामा ऑनलाईन – पश्चिम भारतातील उष्ण हवेमुळे मान्सूनच्या प्रवासाला अडथळा येत असून पुढील काही दिवसात मान्सूनच्या हवेचा दाब वाढल्यानंतर या उष्ण हवेवर मात करुन मान्सूनची वाटचाल वेगाने सुरु होण्याची शक्यता आहे. येत्या १३ जूनपर्यंत मान्सून गोव्यासह दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात येण्याची शक्यता आहे.
मान्सूनने शनिवारपर्यंत केरळ, तामिळनाडुतील अमिनी दिवी, कोची, मदराई या भागापर्यंम मजल मारली आहे. येत्या ४८ तासात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्ष्यद्विप परिसर, केरळ, तामिळनाडुचा आणखी काही भाग, दक्षिण-पश्चिम, दक्षिणपूर्व, पूर्व मध्य आणि उत्तर पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग, मध्य अरबी समुद्रात आगमनाच्या दृष्टीने अनुकुल वातावरण आहे. तसेच ईशान्यकडील राज्यात मान्सूनचा आगमनाच्या दृष्टीने अनुकुल वातावरण असून येत्या ४८ तासात ईशान्य भागात मान्सून पोहचण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. पश्चिम भारतात उंचावर असलेल्या उष्ण हवेचा दाब जास्त असल्याने मान्सूनचे वारे पुढे सरकण्यास अडथळा ठरत आहे. येत्या १० ते १२ दिवसात या उष्ण हवेचा दाब कमी होईल व मान्सूनच्या वाऱ्याचा जोर वाढल्यावर मान्सून वेगाने भारताच्या पश्चिमेकडे अधिक प्रगती करेल.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता, येत्या १३ जूनपर्यंत मान्सूनचे गोवा आणि दक्षिण कोकणातील काही भाग तसेच दक्षिण महाराष्ट्रातील काही ठिकाणी आगमन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडा, विदर्भाच्या दिशेने त्याची प्रगती हळूहळू होण्याची शक्यता आहे.
मान्सून उशीरा येत असल्याने जूनमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. जेथे सामान्य पाऊस होतो, तेथे यंदा अधिक पावसाची शक्यता नाही. कोकण, मध्य महाराष्ट्रात जूनमध्ये पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागामध्ये पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. या भागात सामान्यापेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे.
पाणीसाठे जपून वापरण्याची गरज यंदा मान्सून उशीरा येत असून त्यामुळे पावसाचे प्रमाणही सुरुवातीला कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरुवातीलाच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेततळी तयार करुन त्यात पडलेल्या पावसाचे पाणी साठविण्याची तयारी शेतकऱ्यांनी करावी. जेणे करुन त्याचा उपयोग पाऊस नसलेल्या दिवसात पिकासाठी करता येईल.