बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सत्ताकारणामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्याने जेडीयूला अशा परिस्थितीत जास्त आणि महत्वाची खाती मिळण्याची शक्यता आहे. भाजपा सुत्रांनुसार वायएसआर कॉंग्रेस लवकरच एनडीएत सहभागी होईल. यावर बोलणी सुरु आहे. सरकारने आणलेल्या विधेयकाला वायएसआरने समर्थन केले. एनडीएचा घटकपक्ष बनल्यानंतर त्यांना सरकारमध्ये जागा देऊ शकतात. वायएसआर आणि भाजपाशी जवळीक वाढल्याने टीडीपी चिंतेत असल्याचे दिसत आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या विस्तारात नितीश कुमारांचा जेडीयू पक्षही सहभागी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यंमंत्री जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर कॉंग्रेस पार्टीलाही एनडीएत सहभागी करुन घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. याच दरम्यान टीडीपीने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा देत भाजपाशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सध्या भाजपा टीडीपीकडे लक्ष देण्यास तयार नाही.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्याने एनडीएतील घटक पक्षांशी नाराजी समोर आली होती. अधिवेशनापूर्वी झालेल्या एनडीएच्या बैठकीचे निमंत्रणही शिवसेनेला दिले नव्हते. या बैठकीत एनडीए घटकपक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी संयोजकाची नियुक्ती व्हावी अशी मागणी झाली होती.
जेडीयूच्या सूत्रांनुसार मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपाकडून हालचाली सुरु झाल्याच. सरकारमध्ये सहभागी न झाल्याने बिहारमधील जेडीयू-भाजपा युतीबाबत शंका उपस्थित केली जाते. पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणुका असल्याने अशाप्रकारे वातावरण निर्माण होणे चुकीचे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होण्याल जेडीयू तयार झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला जेडीयूने विरोध केला होता तो मावळत त्यांनी विधेयकाला संसदेत पाठिंबा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार करुन एनडीएतील घटक पक्षांचं समाधान करण्याच्या तयारीत आहे. तसेच केंद्रिय मंत्री रामविलास पासवान यांच्याजागी त्यांचे पूत्र चिराग यांना मोदी मंत्रिमंडळात सहभागी करु शकतात. चिराग यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळेल तर रामविलास पासवान यांना एनडीएचं संयोजक पद देऊन घटकपक्षांमध्ये समन्वय साधण्याच्या प्रयत्न करणार आहेत.