नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांकडून येत्या काही महिन्यांत टॅरिफ प्लॅनच्या किमतीत वाढ करण्याची तयारी केली जात आहे. त्यानुसार, ग्राहकांना मोबाईलवर बोलणे आणि इंटरनेटचा वापर करणे आता महाग होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांची ही दरवाढ येत्या 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.
‘इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजेन्सी’ (ICRA)च्या रिपोर्टनुसार, येत्या 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये महसूलात वाढ करण्यासाठी कंपन्यांकडून पुन्हा एकदा टेरिफमध्ये वाढ केली जाऊ शकते. असे असेल तरी यामध्ये किती रुपयांची वाढ होईल, याबाबतची माहिती दिली गेली नाही. यावर्षी बेसिक पॅक सुमारे 220 रुपये होऊ शकतो. त्याच्या पुढच्या 2 वर्षांत इंडस्ट्रीचे रेव्हेन्यू 11 टक्क्यांपासून 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिनमध्ये सुमारे 38 टक्के वाढ होईल.
कोरोना महामारीचा परिणाम नाही
कोरोना महामारीत देशातील विविध क्षेत्रावर याचा परिणाम झाला होता. मात्र, टेलिकॉम क्षेत्रात कोणताही परिणाम झाला नाही. लॉकडाऊनमध्ये डाटा युसेज आणि टॅरिफमध्ये केलेल्या वाढीमुळे कोणताही प्रभाव पडला नाही. तसेच वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेसमुळे इंटरनेट डाटाचा वापर वाढला होता.
टेलिकॉम कंपन्यांकडे 1.6 लाख कोटींची थकबाकी
टेलिकॉम कंपन्यांवर एकूण एडस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (AGR)ची 1.69 लाख कोटींची थकबाकी आहे. तसेच आत्तापर्यंत फक्त 15 टेलिकॉम कंपन्यांकडून 30,254 कोटी रुपये दिले गेले आहेत. त्यामध्ये एअरटेलची सुमारे 25,976 कोटींची, व्होडाफोन-आयडियाची 50,399 कोटी रुपये थकबाकी आहे.