मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काही दिवसांपासून मनसे पक्ष आपल्या झेंड्यात काही बदल करणार असल्याची चर्चा होती. आणि आता भाजप आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच मंगळवारी भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. त्या भेटीनंतर अनेक तर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपसोबत युती करणार असल्याचे संकेत दिले होते आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती, भाजपवर नाही, असे सांगितले.
तसेच आता राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. सभागृहातील सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात मनसे आणि भाजप यांची युती होऊ शकते. परंतु राज आणि फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली त्याबद्दल काही माहित नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनीही आपली प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट ही राजकीय भेट नव्हती तर सदिच्छा भेट होती. आणि भविष्यात काहीही घडू शकते, असे म्हटले. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकते असे वाटत नसताना देखील ते एकत्र आले. तेव्हा महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे. भविष्यात काहीही घडू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहे.
२३ जानेवारीला मनसेचे अधिवेशन होणार असून त्यात नागरिकत्व कायद्यावरून राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी याबाबत चर्चा होणार असल्याची शक्यता दर्शविली जात आहे.