मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आपली धडाकेबाज आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेले नितीन नांदगावकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकीवेळी मनसे सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. पण मनसे सोडली तरी राज ठाकरे हे खूप चांगले आहेत. पण त्यांच्या जवळ असणारे नेते हे कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. माझ्याबाबतीतही असेच झाले. याच नेत्यांनी रचलेल्या षड्यंत्रामुळे मी मनसेतून बाहेर पडलो, असा आरोप नितीन नांदगावकर यांनी केला होता. यावर स्पष्टीकरण देत मनसेमध्ये त्यांच्यासोबत कोणताही अन्याय झाला नसल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत नितीन नांदगावकर यांना विक्रोळी मतदारसंघाचे तिकीट देण्यास हरकत नसल्याचे विक्रोळी मतदार संघातील नेते व कार्यकर्त्यांनी सांगितले होते. यांनतर मी स्वतः नितीन नांदगावकरला बोलावून त्याला विक्रोळी मतदारसंघातून तुला निवडणूक लढवायचे आहे, असे सांगितले. मात्र नितीनला स्वतःहून निवडणूक लढवायची इच्छा नव्हती. पण पक्ष निवडणुकीचा खर्च करण्यास तयार असेल तर मी निवडणूक लढवेन असे नितीनने सांगितले. परंतु पक्षाकडून जेवढा शक्य होईल तेवढा खर्च करण्यात येईल, असे नितीनला सांगितले. कारण पूर्ण खर्च करणे पक्षाला शक्य नसल्याचे त्याला सांगण्यात आले, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
नितीन नांदगावकर यांनी अनेक ठिकाणी जाऊन लाईव्ह विडिओ करून एखाद्याच्या कानाखाली मारणे चुकीचे असल्याचे त्याला सांगितले होते. त्यासाठी त्याला तडीपार करण्याची नोटीसही देण्यात आली होती. ती नोटीस आल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन करून त्या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. नितीन नांदगावकर माझा पुतण्या असून राज ठाकरे यांनी देखील त्याचे अनेकदा कौतुक केल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच नितीन नांदगावकर यांनी खूप कामे केली असली तरी थोड्या चुकाही केल्या होत्या. नितीनला सांभाळून राहावं असेही सांगितले असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले.