मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – संबंध महाराष्ट्रामध्ये दुष्काळसद्रुश्य परिस्थिती असताना महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला दिलं जात असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. सरकारने जवळपास ४६ टीएमसी पाणी गुजरातला वळवल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील जवळपास १३ जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी हे गुजरातच्या शेतीला दिलं जात आहे. मोदी आणि शाह जोडीला खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गुजरातला पाणी दिलं आहे, असा गंभीर आरोप नितीन भोसले यांनी केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात गुजरातला पाणी देण्याचा असा कोणताही करार झाला नाही. मुख्यमंत्री जाहीर भाषणात खोटी माहिती देत जनतेची दिशाभूल करत आहेत, असेही भोसले म्हणाले.
गुजरातला जाणारं पाणी बंद करून ते महाराष्ट्रासाठी वापरावं असेही त्यांनी सांगितले सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही तर ‘पाण्यासाठी १३ दुष्काळी जिल्ह्यात पाणी यात्रा काढणार’ असल्याचे भोसले यांनी सांगितले.