बहुजननामा ऑनलाइन टीम – “धुळे-नंदुरबार विधान परिषदेचा निकाल आश्चर्यकारक नाही. भाजपचे बालेकिल्ले असणाऱ्या पुणे आणि नागपुरात महाविकास आघाडीस मिळालेलं यश खूप महत्त्वाचे आहे. महाविकास आघाडीने मागील वर्षभरापासून एकत्र येत काम केले, ते लोकांनी स्वीकारले. महाराष्ट्राचे चित्र पालटत असून, सर्वसामान्य लोकांचा महाविकास आघाडीस पाठिंबा मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटलांना टोला
‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधाने करणे लौकिक आहे. गेल्यावेळी आमच्यात एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याने ते विजयी झाले. यंदा त्यांना अंदाज होता म्हणून त्यांनी पुणे शहरातील त्यांच्या दृष्टीने सोयीचा मतदारसंघ निवडला. चंद्रकांत पाटील यांना विश्वास असता तर त्यांनी मतदासंघ बदलला नसता,’ असा टोला शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. त्याचसोबत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.
बंडखोरी झाल्याने पाटील निवडून आले
पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातून मागील वेळी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध उमेदवारी देण्यात आली होती. पण तेव्हा सांगलीच्या अरुण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला. या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या जवळपास मतदान झाले, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मते पडली, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपने ही जागा जिंकली. त्यात अरुण लाड यांनी २५ हजारांहून अधिक मते घेतल्याने त्यांच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता.