पुणे : बहुजननामा ऑनलाईन- पाऊस नाही पिकपाणीही नाही मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का असा सवाल राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. पुण्यातील यशदामध्ये बुधवारी(दि 11 सप्टेंबर) राज्यातील आदर्श गावांना सावंत यांच्या आदर्श गाव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी सावंत बोलत होते. तेव्हा त्यांनी हा सवाल केला. काही दिवसांपर्वी तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटलं असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या अशा वक्तव्यांमुळे त्यांची जीभ वारंवार घसरत असल्याची चर्चा होताना दिसत आहे.
‘पाऊस नाही. पिकपाणीही नाही. मग शेतकऱ्यांनी झक मारायची का ?’
तानाजी सावंत म्हणाले की, “राज्यात 100 टक्के पाऊस पडणार, 150 टक्के पाऊस पडणार अशी आकडेवारी अधिकारी कागदावर रंगवून मंत्री चक्क खोटी माहिती देतात. प्रत्यक्षात 30 टक्के किंवा 40 टक्के पाऊस पडतो. त्यात बँकांकडून शेतकऱ्यांना पुरेशे आणि वेळेवर पीक कर्जही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पाऊस नाही. पिकपाणीही नाही. मग शेतकऱ्यांनी झक मारायची का ?” असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.
‘इंग्रजांनी घालून दिलेली चौकट मोडायला हवी’
इंग्रजांनी घालून दिलेली चौकट मोडायला हवी असं मत व्यक्त करताना सावंत म्हणाले की, “कोणतेही काम हाणून पाडण्यासाठी अधिकारी अनेकदा नियमांची चौकट पुढे करतात. इंग्रज जाऊन 70 वर्षे झाली. तरीसुद्धा आजही त्यांचीच नियमांची चौकट आमलात आणली जाते. ही चौकट मोडली पाहिजे. लोकांचे हित जोपासणारे निर्णय आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे.” असे ते म्हणाले.