बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा (Rape) आरोप करण्यात आला आहे. तर राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. यामुळे दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. (NCP announces official position)पक्षाचे दोन मंत्री अडचणीत आले असताना राष्ट्रवादीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही कोणीही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा आहे. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहे. हे भाजपचं काम आहे. पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असे जयंत पाटील यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या प्रकरणावर बोलताना म्हणाले, नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही. पण सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. जावयाने काय केलं, त्याचं खापर सासऱ्यावर का फोडता ? असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकार दबावाचं राजकारण करत आहे, हे जगजाहीर आहे. देशाच्या जनतेला हे सगळ कळत आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार का ? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी उत्तर देणं टाळलं.