औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – एमआयएमने वंचित बहुजन आघाडीला तलाक दिल्यानंतर आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. एमआयएमने 74 जागांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. इतकेच नाही तर उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आल्या आहेत. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. यावेळी बोलताना जलील म्हणाले की, “कोणासोबत युती नसल्याने किती जागांवर उमेदवार लढवायचे यावर बंधन नाही. औरंगाबादमध्ये आज मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदावारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. टप्प्याटप्प्याने इतर मतदारसंघातील उमेदवारांच्याही मुलाखती होणार आहेत. सध्या एमआयएम 74 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे.”
पुढे बोलताना जलील म्हणाले की, “एमआयएमसोबत दलित, मराठा आणि ओबीसी समाज आहे. दलित किंवा अन्य कोणत्या समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे असे कोणी समजू नये. वंचितसोबत आघाडी न झाल्याने आता अनेक पक्षातील नेते एमआयएमशी आणि उमेदवारांशी संपर्क करत आहेत.” असेही जलील यांनी सांगितले.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून वंचित आणि एमआयएममध्ये फूट पडली आहे. जलील यांनी आधीच स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यानंतर दोन्ही पक्षात आरोप प्रत्यारोप होताना दिसले. यानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी आघाडीतील बिघाडीवर शिक्कामोर्तब केलं. इम्तियाज जलील यांनी केललं वक्तव्य म्हणजे पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं स्पष्टीकरण ओवेसी यांनी दिलं.