नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. दिवसेंदिवस बाधितांच्या संख्येत वाढत होत असून कोरोना साखळी तोडण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी निर्बंध लावले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर एम्सचे प्रमुख आणि कोविड टास्कफोर्सचे महत्त्वाचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केल आहे. त्यांच्या मते, कोरोना साखळी तोडायची असेल तर मायक्रो लॉकडाऊन गरजेचाच असल्याचे म्हंटले आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येला आळा घालणं आणि सुरक्षेच्या सूचनांचं पालन करण्यासाठी नव्या रणनितीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुलेरिया म्हणाले, कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नाही तोपर्यंत आरोग्य व्यवस्थेवरील ताण कायम राहणार आहे. सध्या देशात सामुदायिक संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मायक्रो लॉकडाऊन हा एक पर्याय आहे. तसेच जलदगतीने वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येला ब्रेक लावण्यासाठी कन्टेन्मेंट झोन, लॉकडाऊन एरिया, चाचण्यांची संख्या, ट्रेसिंग आणि आयसोलेशन अशा पर्यायांचा वापर केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
अर्थव्यवस्थेला फटका न बसणारी पावलं उचलावी
कोरोना साखळी तोेडण्यासाठी पावले उचलताना अर्थव्यवस्थेचाही विचार करायला हवा. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार नाही अशीच पावले उचलणे योग्य ठरणार आहे. अनावश्यक प्रवास टाळणे, सुट्टीच्या कालावधीत बाहेर जाणे टाळणे यासांरख्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कोरोनाच्या संसर्गावर अंकुश लावण्यास मदत मिळू शकते. यामुळे जेथे कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणीही लक्ष देता येते असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. दरम्यान, केवळ हवाई प्रवसाबद्दलच आम्ही बोलत नाही तर रस्ते आणि वाहनांच्या हालचालींबद्दलही बोलत आहे. पंरतु, हे किती अवघड आहे हे तेव्हा समजेल जेव्हा आपण याकडे संपूर्णतेकडे पाहू. जीनोम सिक्वेंन्सिंग आणि त्याच्या महासाथीच्या डेटाच्या जोडणीसाठी हे महत्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.