मेरठ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात मागच्या मंगळवारी झालेल्या जवानाच्या हत्येप्रकरणी नवा खुलासा समोर आल्याने पोलिसांनी मृत जवानाची पत्नी आणि सख्या भावाला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक अखिलेश भदौरिया यांनी गंगा नगर पोलीस ठाण्यात पत्रकारांसमोर या हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा केला. परीक्षित गड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्वेशपुर गावात मंगळवारी रात्री बीएसएफचे जवान संजीव यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
भाजी काढण्याच्या बहाण्याने घेऊन गेली शेतात
संजीव हे श्रीनगरच्या कुपवाड़ामध्ये तैनात होते आणि अचानक 15 दिवसांची रजा घेऊन ते एक दिवस आधीच आपल्या घरी आले होते. यानंतर त्यांची पत्नी गीतांजली मंगळवारी सायंकाळी त्यांना शेतात भाजी काढण्यासाठी सोबत घेऊन गेली होती. गीतांजलीचे म्हणणे आहे की, अज्ञात गुन्हेगारांनी गोळी मारून तिच्या पतीची हत्या केली. तर, घटनेनंतर पोलिसांना गीतांजलीवर संशय होता.
अवैध संबंधामुळे केली हत्या
पोलीस निरीक्षक अखिलेश भदौरिया यांनी या हत्याकांडाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले, संजीव यांचा विवाह एक वर्षापूर्वी गीतांजलीसोबत झाला होता. संजीव नोकरीवर गेल्यानंतर गीतांजलीचे दिर गुलाब सिंह उर्फ गुल्लू सोबत अवैध संबंध निर्माण झाले. संजीव हे जेव्हा जेव्हा रजेवर घरी येत असत तेव्हा सतत गीतांजलीशी वाद घालत असत.
पोलिसांनी दोघांना केली अटक
यामुळे त्रस्त झालेल्या गीतांजलीने आपला दिर गुल्लूसोबत कट रचून पती संजीव यांची हत्या करण्याचे ठरवले. या कटाप्रमाणे मंगळवारी गीतांजली संजीवला आपल्या सोबत शेतात घेऊन गेली. जेथे घात करण्यासाठी गुल्लू आधीच लपून बसला होता. संधी मिळताच त्याने थेट आपला भाऊ संजीव याच्या डोक्यात गोळी मारली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्टल ताब्यात घेण्यात आले आहे.
Visit : bahujannama.com