पुणे : बहुजनामा ऑनलाइन – पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात शहराचा मृत्यू दर राज्याच्या विशेषतः मुंबईच्या तुलनेत दोन टक्क्यांनी खाली आला असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. पण प्रशासनाच्या या दाव्याला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी छेद दिला आहे. पुणे शहरात कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एक हजार मृत्यू हे रोजच्या आकडेवारीत नोंद केलं नसल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मोहोळ बोलतं होते. ते म्हणाले रोज वेगवेगळ्या रुग्णालयात पोहचण्यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात येत नाहीत. मात्र, त्यांचे एक्स-रे काढण्यात आले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. एकट्या ससूनमध्ये रोज असे दहा बारा रुग्ण दगावत आहेत. ज्याची नोंद मृत्यूमध्ये घेतली जात नाही. म्हणून पुण्यात साधारणतः साडेचारशे ते पाचशे मृत्यू अशा पद्धतीने महिन्याला होत असतील तर, पुण्याचा मृत्यूदर हा निश्चितच दुप्पट वाढणार आहे. तसेच आकडेवारी लवपण्याचा आमचा कोणताही उद्देश नसल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.
‘समूह संसर्ग’ झाला नाही
मोहोळ म्हणाले, एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊन सुद्धा तो आजारपण आंगावर काढतं असेल, माहिती लपवत असेल अशांच्या बाबतीत मृत्यू झाल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच अन्य आजार असलेल्या रुग्णांना शोधण्यास व त्यांच्यापर्यंत पोहचण्यास आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे लपवणे योग्य नसल्याचे म्हणत, शहरात कोरोनाचा ‘समूह संसर्ग’ झाल्याचं त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना नाकारलं.
महापालिकेच्या सर्व रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजन
कोरोनाची लागण झालेले अनेक मृत्यू रुग्णालयात जाताना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या गंभीर रुग्णांना रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सुविधा मिळाली तर मृत्यू रोखता येतील. म्हणून महापालिकेच्या सर्व रुग्णवाहिका ऑक्सिजन सुविधांसोबत सज्ज ठेवण्यात याव्यात, असे निर्देश महापालिका प्रशासनास देणार असल्याचं मोहोळ म्हणाले.
नागरिकांनी आजार लवपू नये
अनेक नागरिक आपला आजार लपवित असून अगदी शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल होत आहे. त्यावेळी संबंधित रुग्णाला घरातून रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अथवा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू होत आहे. म्हणून नागरिकांनी आपला आजार लवपू नये, दुखणे अंगावर काढू नये असे आवाहन मोहोळ यांनी यावेळी केले.