अकोला बहुजननामा : विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाने १२ जागांसाठी दावा केला असून भाजप – शिवसेना महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री आमच्यावर राजकीय अन्याय करणार नाहीत, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी विनायकराव मेटे अकोल्यात आले असताना , शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसंग्राम पक्षाने आपली भूमिका दर्शवली. त्यात त्यांनी बीड , अकोल्यासह १२ जागांवर शिवसंग्रामने दावा केला. त्या संदर्भातील माहिती भाजपाला दिली असून, जागा वाटपा संदर्भात चर्चा झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
घटक पक्षांवर अन्याय होणार नाही , आधी घटक पक्षाचा विचार केला जाईल नंतर उरलेल्या जागांसाठी भाजप – शिवसेना विचार करेल असा विश्वासहि त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसंग्राम स्वतःच्या चिन्हांवरच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे , प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील तसेच विद्यार्थी नेते शैलेश सरकटे आदींनी हजेरी लावली होती. यावेळी मेटे यांनी पवारांवे जोरदार शब्दांत हल्लाबोल केला, राष्ट्रवादी पक्षातून अनेक नेते पक्षांतर करत आहेत. त्याला पवारच जबाबदार आहेत. आर.आर. पाटलांनंतर पक्षाने सर्वसामान्य चेहरा दिला नाही. त्यामुळे भाकरी करपण्याची पवार स्वतः जबाबदार असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
२०१४ पासून शिवसंग्राम प्रामाणिकपणाने काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी सामाजिक प्रश्न सोडवले तरी , राजकीय आश्वासन पाळली नाहीत. आमच्यावर राजकीय अन्याय झाला तरी घटक पक्ष म्हणून प्रामाणिक पने काम करू,असे विनायक मेटे यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षणानंतर शिवसंग्राम आता धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार आहोत तसेच शेतकरी व शेतमजुरांना पेंशन व ६० वर्षे पूर्ण पुरुषांना व ५५ वर्षीय महिला निवृत्ती वेतनाचे अर्ज मुख्यमंत्रांकडे सोपविणार आहोत आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी अश्या सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देणार आहोत , असे मेटे यांनी जाहीर केले.