सातारा : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. पण आता आरक्षणासाठी आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे शासनाने तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्ष प्रमुख आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
शांततेच्या मार्गाने आंदोलन करून यश मिळविता येते हे सकल मराठा समाजाने आपल्या मोर्चा व आंदोलनातून दाखवून दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले,सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सर्व पक्ष व त्यांचे लोकप्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला तसेच पाठींबा दिला.आणि आज न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला.
आरक्षणाचा फायदा समाजातील युवकांना नोकरी व शिक्षणासाठी होईल. तसेच आता शासनाने आंदोलनादरम्यान मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे ही तातडीने मागे घ्यावेत. याबाबत मी विधानसभेतही आज मागणी केली आहे, असेही आमदार शिंदेंनी स्पष्ट केले.