मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी अध्यादेश जारी केला. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले होते. हा तिढा सोडविण्यासाठी आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेशाचा मार्ग अवलंबला आहे.आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. अध्यादेश आता स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाईल आणि त्यांनी स्वाक्षरी केल्यावर अध्यादेश लागू होईल, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान , केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रवेशासाठी जागा वाढवून देण्याबाबतही राज्य सरकारनं केली आहे. १२ दिवसांपासून वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू करावं यासाठी विद्यार्थांचं आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.