लातूर : बहुजननामा ऑनलाईन – शिवजयंतीच्या खर्चात बचत करून ही रक्कम पुलवामा हल्ल्यातील शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय लातूर मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. देश रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्या सैनिकांमुळे देश व देशवासीयांचे स्वातंत्र्य सुरक्षित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह राजपूत व चोरपांग्राचे नितीन राठोड यांना वीरमरण आले.
या घटनेने त्यांच्या परिवारावर आभाळ कोसळले आहे. अशावेळी त्यांच्या परिवाराला धीर देणे, मदत करणे हा मानवधर्म समजून हा निर्णय घेण्यात आला आहे. लातूरचा मराठा क्रांती मोर्चा सदैव सामाजिक कार्यासाठी अग्रेसर आहे. दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने समाजोपयोगी कार्यक्रम घेतले जातात. यात विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, व्याख्याने, रक्तदान, शिबिरे पोवाड्याचे कार्यक्रम आदींचा अंतर्भाव असतो. विशेष म्हणजे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा हे या शिवजयंतीचे वेगळेपण असते.
त्यावर मोठा खर्च होतो, परंतु देशाच्या सैन्य दलावर अमानवीय हल्ला झाल्याने सारा देश व्यथित झाला आहे; हीच मराठा क्रांती मोर्चाची भावना असल्याने शिवजयंतीच्या खर्चात बचत करण्याचा व तो निधी शहिदांच्या वारसांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मदत निधी शहिदांच्या वारसांना सुपूर्द करण्यात येणार आहे शहीद नितीन राठोड व संजयसिंह राजपूत हे शिवरायांच्या विचारांचा वारसा जपणारे मावळे होते. शिवछत्रपती सदैव प्रजेच्या पाठीशी राहिले. त्यांचा हा वसा, वारसा जपला जावा या भावनेतून मराठा क्रांती मोर्चा ही मदतीचा हात देऊन त्यांच्या परिवाराला धीर देणार आहे.