सुलतानपुर : वृत्त संस्था – आपल्या दोन दिवसाच्या दौर्याच्या निमित्ताने सुलतानुपर लोकसभा मतदार संघात आलेल्या मेनका गांधी यांच्या निवासस्थानी तक्रारदारांची रांग लागली होती. यावेळी एक महिला लम्भुआ परिसरात वृक्षतोड झाल्याची तक्रार घेऊन आली. वृक्षतोडीची तक्रार ऐकताच मेनका गांधी प्रचंड भडकल्या. त्यांनी एसएचओ ला फोन केला आणि म्हणाल्या, आजच्या दिवसात जर तुम्ही झाडे तोडणार्याला उचलला नाही तर माझ्यासारखे वाईट कुणी नाही.
मेनका यांनी पुढे म्हटले की, तुमच्या भागात एवढ्या मोठ्याप्रमाणात वृक्षतोड झाली, तुम्ही आजपर्यंत काहीच केले नाही. पृथ्वीपाल यांनी झाडे तोडली आहेत, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांना उचला अगोदर आणि पोलीस ठाण्यात टाका.
मेनका गांधी या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या असून त्या पर्यावरण आणि प्राणीप्रेमी असल्याचे सर्वांनाच माहित आहे. अनेकवेळा त्यांनी मुक्या जनावरांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. त्यांच्या या प्राणीप्रेमामुळे त्यांच्यावर टीकासुद्धा यापूर्वी झाली आहे.