मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. या सगळ्या घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी होते. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे त्यामुळे आम्ही विरोधात बसणार असा निर्णय विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी घेतला होता. भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ही तीनही जवळ येऊ लागले.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याची भूमिका घेतली. मात्र अजित पवार यांनी अचानक बंड करून सर्वांनाच धक्का दिला. अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचीही सहमती आहे का, अशीही चर्चा राज्यभर सुरू झाली. परंतु, शरद पवार यांनी अजित पवारांचे बंड मोडून काढले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपत घेतली. त्यासोबतच तीनही पक्षातील इतर दोन दोन मंत्र्यांनी देखील मंत्री पदाची शपत घेतली.
शरद पवार यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळेच महाविकास आघाडीचे सरकार आकार घेऊ शकले. तीनही पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही असे जरी विरोधक म्हणत असले तरी या सत्ता समीकरणाच्या केंद्रस्थानी शरद पवार असल्यामुळे हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अशी आशा तीनही पक्षांना वाटते. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र अजूनही याबाबतचा तिढा सुटलेला नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे.
शरद पवार यांच्या वाढदिवसाला म्हणजेच १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी चर्चा महाविकास आघाडीच्या गोटात रंगू लागली आहे. त्यामुळे कोणाला कोणते खाते मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.