नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे ते चर्चेत आहेत. गांधींच्या नेतृत्वात भारतामध्ये झालेले स्वातंत्र्याचे आंदोलन हे एक नाटक असल्याचे हेगडे यांनी म्हटले आहे. तर तिथेच न थांबता गांधींच्या ‘महात्मा’ या पदवीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
शनिवारी कर्नाटकमधील बंगळूर येथे एका जनसभेत ते बोलत होते. तसेच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचाही उल्लेख करत पूर्ण स्वातंत्र्य संग्राम ब्रिटिश सरकारच्या परवानगी आणि समर्थनातून रचण्यात आला. स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान तथाकथित नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नाही. एकदाही नाही. गांधींचा स्वातंत्र्य संग्राम हे एक नाटक होत, असे हेगडे म्हणाले .
तसेच गांधींचे उपोषण आणि सत्याग्रह हेही एक नाटक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसच्या समर्थकांबद्दल बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसचे समर्थक म्हणतात की, आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असून ते बरोबर नाही. इंग्रजांनी सत्याग्रहामुळे देश सोडला नाही तर इंग्रज निराश झाल्याने भारतातून निघून गेले होते, असेही हेगडे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मी जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा मला अत्यंत राग येतो. देशाबद्दल असं नाटक करणाऱ्या गांधींसारख्या व्यक्ती आपल्या देशात महात्मा म्हणवून घेतात.