बहुजननामा ऑनलाइन – आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना अनलॉकबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. आता लॉकडाऊनचा विषय राहिला नसून नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र अनलॉक होणार आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा करूयात, असे टोपे यांनी म्हंटले. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
कोरोनाची स्थिती आणि उपायोजनांबाबत टोपे म्हणाले, आरटीपीसीआर टेस्टचा रेट 800 रुपयांपर्यंत आणला आहे. कोरोना व्हायरसवर अजून लस आलेली नाही, त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे.
मास्कच्या किंमतीवर आरोग्यमंत्री म्हणाले, एन 95 मास्क बाजारात 150 ते 200 रुपयाला मिळतो. परंतु, तो उत्पादन किंमत 12 रुपये आहे. एमआरपीनुसार तो 19 रुपयांपर्यंत विकला पाहिजे, असे असताना पुरोगामी राज्याला हे कदापि मान्य नाही. त्यामुळे आता समिती स्थापन करून अशा विक्रेत्यांना दिशा, आणि निर्देश दिले आहेत.
टीआरपी घोटाळ्यावर विचारलेल्या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, काही न्यूज चॅनलचे टीआरपी प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. कायद्याच्या अनुषंगाने धूळ फेकण्याचे काम काही चॅनल्सने केले आहे. त्यांच्यावर कठोरतील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे.