Maharashtra Weather | ऑक्टोबर हिटच्या झळा आणि मुसळधार पावसाचं संकट; पुढचे 4 दिवस कसं राहणार राज्यातलं हवामान?
मुंबई : Maharashtra Weather | अरबी समुद्रात निर्माण झालेले शक्ती चक्रीवादळ आता ओमानकडे सरकत असले तरी, त्याचे परिणाम महाराष्ट्रात अजूनही जाणवत आहेत. चक्रीवादळामुळे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि पाकिस्तानकडून येणारे चक्रीवादळ यामुळे हवामानात मोठे चढउतार होत आहेत. काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा धोका आहे, तर काही भागात कडक उष्णतेचा धोका आहे. अशीच विपरीत परिस्थिती पुढील काही दिवसांत दिसून येईल.
मान्सूनच्या परतीच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिलेला अंदाज सावध करणारा आहे. कारण पुढचे चार दिवस पाऊस, उकाडा आणि दमट हवामान अनुभवयाला मिळू शकणार आहे. शक्ती चक्रीवादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले आहे. अरबी समुद्रात पुढे सरकले असून, आज 7 ऑक्टोबरला त्याची तीव्रता आणि परिणाम आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या शक्ती चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
कोकण विभागातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला. मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. समुद्रकिनारी भागांतील नागरिकांना हवामानातील बदल लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.
बुधवारी, ८ ऑक्टोबरला विदर्भ वगळता महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे. कोकणपट्ट्यात मेघगर्जनेसह पाऊस राहण्याची शक्यता आहे. ९ आणि १० ऑक्टोबरला महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील. या वेळी दमट हवामान राहणार असून, त्यामुळे उकाडा वाढण्याची शक्यता आहे. ११ आणि १२ ऑक्टोबरला पाऊस पूर्णपणे जाणार आहे. तसेच, उकाडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.



Comments are closed.