कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिट दिली आहे. दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मुळात राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांतदादानी माझे नाव घातले.
चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ म्हणाले की, राज्य सहकारी बॅंकेच्या चौकशीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ कलम 88 लावले होते. मात्र त्याच्या चौकशीसाठी चंद्रकांत पाटलांनी अधिकारी आणले होते.
सत्ता असताना भाजपमध्ये अनेकजण गेले होते. मी चंद्रकांतदादांना म्हणालो होतो ही सत्तेची सूज आहे. आता ती सूज कमी व्हायला सुरुवात झाली आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट येत आहे, नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. जो कोणी मास्क घालणार नाही, त्याला दंड ठोठावला पाहिजे, असे देखील मुश्रीफ म्हणाले.