मुंबई बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी चांगलीच तयारीला लागली आहे. सर्व घटकांचं आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधत देशभरात आरक्षणावरुन गोंधळ असल्याची टीका त्यांनी केली आहे.
“ओबीसींना २७ टक्के आरक्षण संपुष्टात येईल अशी भीती वाटत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. मात्र ही भीती दूर करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा किंवा शिवसेना कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही”. ओबीसी आणि मराठा आरक्षण टिकवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या हातात सत्ता द्या असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. मराठा आरक्षण दिल्यामुळे ओबीसी गट नाराज झाला आहे.
त्यामुळे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला ‘अ’ आणि मराठा आरक्षणाला ‘ब’ असा गट देत विभागणी केली असती तर तर ओबीसी आरक्षण जाईल अशी भीती निर्माण झाली नसती आगामी काळात ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.