मुंबई बहुजननामा ऑनलाईन-यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ मिळून स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीने मतांच्या टक्केवारीनुसार तिसऱ्या क्रमांकावर मजल मारली. मात्र, नोंदणीकृत राजकीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी करण्यासाठी लागणाऱ्या मतांपासून दूर राहिल्याने आघाडीला निवडणुकीसाठी कायम चिन्ह आणि इतर निवडणूकविषयक सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र वंचित आघाडी पुढील निवडणूक नोंदणीकृत पक्ष म्हणून लढणार असल्याचे स्पष्टीकरण बहुजन वंचित आघाडीचे प्रवक्ता राजेंद्र पोटोडे यांनी दिली.
औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील हे वंचित आघाडीचे उमेदवार असले तरी, त्यांनी एमआयएमचे उमेदवार म्हणून निवडणूक लढली. ती मते बहुजन वंचित आघाडीच्या खात्यात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मान्यताप्राप्त पक्षासाठी आवश्यक आठ टक्के मते आघाडीकडे नाहीत. वंचित आघाडी पुढील निवडणूक नोंदणीकृत पक्ष म्हणून लढेल. असे पोटोडे यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने २०१८ मध्ये जारी केलेल्या नियमानुसार मान्यताप्राप्त राजकीय पक्ष म्हणून दर्जा मिळण्यासाठी एकूण वैध मतांच्या किमान आठ टक्के मते त्या पक्षाला मिळणे आवश्यक आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला मान्यताप्राप्त पक्ष होण्यासाठी काही काळ थांबावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत .