बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठाकरे सरकारने निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत नवे नियम लागू राहणार आहेत. दरम्यान कोरोना स्थितीची आढवा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. 18) बैठक झाली होती. बैठकीत किराणा दुकानांची वेळ सकाळी सात ते अकरा म्हणजे 4 तासच ठेवण्याचा महत्वाचा निर्णय झाला होता. याबाबतचे अधिकृत पत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहेत नवे नियम ? काय सुरू अन् काय बंद?
राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कनफेकशनरी, सर्व प्रकारची खाद्य दुकान (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकान, पाळीव प्राण्याची खाद्य दुकाने सकाळी 7 ते सकाळी 11 अशा केवळ 4 तास सुरू राहतील. त्यानंतर संपूर्ण दिवसभर ही दुकानं बंद राहणार आहेत. मात्र या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करण्यास मुभा दिली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकानांच्या वेळाबाबत निर्णय घेता येणार आहे.
काय राहणार बंद?
1) राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील
2) राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील
3) क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार
4) धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना देखील परवानगी नाही.
5) विवाहासाठी केवळ 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी
6) अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी
7) सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील.
8) धार्मिक स्थळ बंदच राहतील.